
शेतकरी वडिलांच्या कर्जफेडीची होती चिंता
Indiagroundreport वार्ताहर
हिंगोली :(Hingoli) सेनगाव(Sengaon) तालुक्यातील कारेगाव शिवारात स्वत:च भावपूर्ण श्रध्दांजलीचे स्टेट्स ठेऊन तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उडकीस आला आहे. वडिलांच्या नावे असलेले ७० हजाराचे कर्ज कसे फेडावे?, या चिंतेमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
नवल जयराम नायकवाल(२८) असे तरुणाचे नाव असून, याप्रकरणी सेनगाव पोलीस(Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील कारेगाव येथील जयराम नायकवाल यांचे कारेगाव शिवारात पाच एकर शेत आहे. या शेतात सोयाबीन व इतर पिके घेण्यात आली. मात्र, अतिवृष्टीमुळे(Heavy Rain) तसेच सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, त्यामुळे पेरणीसाठी घेतलेले ७० हजार रुपयांचे कर्ज फेडण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
दरम्यान, नवल नायकवाल(Naval Naikwal) याने गावात हमालीचे काम करून वडिलांचे कर्ज फेडण्याचे प्रयत्न सुरु केले होते. मात्र, कर्ज फिटण्यास मोठा कालावधी लागेल, यामुळे नवल अस्वस्थ होता. शनिवारी(२६ नोव्हेंबर) सायंकाळी तो हमालीचे काम करण्यासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडला. यावेळी त्याने स्वत:च्या स्टेटसवर नवल भावपूर्ण श्रद्धांजली असे नमूद केले, तर साई मंदिराच्यामागे असेही स्टेटसवर नमूद केले. मात्र, या प्रकाराचा उलगडा त्यांच्या कुटुंबियांना झाला नाही.
दरम्यान, आज सकाळी नवल याचा मृतदेह साई मंदिराच्यामागे असलेल्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजीत भोईटे, जमादार अनिल भारती, चव्हाण यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी जयराम नायकवाल यांच्या माहितीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात(police station) अकस्मात मृत्युची नोंद झाली आहे.


