
मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai) उसने घेतलेले पैसे परत न केल्याने एकाचे अपहरण करून गुजरात येथील वापी येथे नेण्यात आलेल्या पीडिताची दिंडोशी पोलिसांनी(Dindoshi police) सुटका केली आहे. याप्रकरणी या किचकट अपहरण प्रकरणाची तांत्रिक पद्धतीने उकल करून ४ जणांना वापी येथून अटक करण्यात आली आहे. जगदेव नरेश साओ, बहादूर निर्मल साहू, राजू वर्मा आणि हर्ष सुनील अशी त्यांची नावे आहेत.
यातील तक्रारदाराने अपहरणकर्त्यांकडून पैसे घेतले होते, मात्र पीडितेकडे पैसे परत करण्यासाठी जवळ पैसे नसल्यामुळे ते पैसे परत दिले नव्हते, त्यामुळे गेल्या ३ नोव्हेंबर २०२३ रोजी आरोपींनी पीडितेचे A-1 हॉटेल, दफ्तरी रोड, मालाड पूर्व, मुंबई येथून अपहरण केले होते. याबाबत दिंडोशी पोलीस ठाण्यात ४ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आरोपींची कॉल डिटेल रेकॉर्ड(सीडीआर) आणि टॉवर लोकेशनसह पोलिसांनी परिश्रम घेऊन पीडितेचा मोबाईल नंबर मिळविला. त्यानुसार पोलीस पथक गुजरातला गेले. त्यांनी वापी, गुजरात(Gujarat) येथे ४ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांनी गुन्ह्यात वापरलेली इको स्पोर्ट कार जप्त केली.

दरम्यान, दिंडोशी पोलीस ठाण्याचे अधिकारी शिंदे, चंद्रकांत घार्गे, अजित देसाई, पीएसआय नितीन नाडिले यांचा समावेश असलेल्या डिटेक्शन पथकाने, तसेच जीवन खरात यांच्यासह ही कामगिरी केली.


