
आयुक्त अभिजीत बांगर यांनी अडचणी, उपाययोजनांचा घेतला आढावा
समर प्रताप सिंग
ठाणे : (Thane) पीएम स्वनिधी या फेरीवाला कर्ज योजनेसाठी ठाणे महापालिका क्षेत्राला ११२३७ अर्जांचे लक्ष्य देण्यात आलेले आहे. ठाण्यासारख्या शहरासाठी हे लक्ष्य मोठे नाही, त्यामुळे सर्व सहाय्यक आयुक्तांनी वैयक्तिक लक्ष घालून हा टप्पा लवकरात लवकर पार करावा, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर(Abhijit Bangar) यांनी नुकतेच दिले.
पीएम स्वनिधी ही केंद्र सरकारची(central government) महत्त्वाकांक्षी योजना आहे. त्याबाबत मुंबईत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधितांची बैठक घेऊन उद्दिष्टपूर्तीबद्दल सूचना दिल्या. डिसेंबर महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम स्वनिधीच्या लाभार्थींना १० हजार रुपयांचे वितरण होणार आहे, त्यामुळे ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
पीएम स्वनिधी योजेनेची प्रगती, त्यातील अडचणी, उपाययोजना यांचा आढावा घेणारी बैठक आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतीच घेतली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपायुक्त वर्षा दीक्षित, पीएम स्वनिधी योजनेचे ठाण्याचे लीड मॅनेजर भारती, सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.
… हे आपले नैतिक कर्तव्य
या कर्जासाठी फेरीवाला पात्र ठरला म्हणजे त्याला अधिकृत फेरीवाल्याचा दर्जा प्राप्त होत नाही. कोरोनाकाळात(corona period) बसलेल्या आर्थिक फटक्यातून सावरण्यासाठी केंद्र सरकारने आणलेली ही योजना आहे. या योजनेचा उद्देश अतिशय चांगला असून, ती जास्तीत जास्त फेरीवाल्यांपर्यंत पोहोचविणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे हे आपले नैतिक कर्त्यव्य आहे, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी स्पष्ट केले.
अर्ज करण्यात काही अडचणी असतील तर त्यात स्वत: लक्ष घालावे. अर्ज भरण्याच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी फेरीवाल्यांचा एक दिवसापेक्षा जास्त वेळ जाणार नाही, याचीही दक्षता घ्यावी. त्यांना हेलपाटे मारावे लागले तर इतर फेरीवाले(hawkers) या योजनेला प्रतिसाद देणार नाहीत. एक तासात अर्ज भरून घ्यावा, अशा सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या.
‘स्वनिधी से समृध्दी तक’ या दुसऱ्या टप्प्यात ठाण्याची कामगिरी चांगली आहे. त्याची शिबिरे दर आठवड्याला घेतली जावीत. फेरीवाल्यांना डिसेंबर २०२४ पर्यंत पहिल्या टप्प्यात १० हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात ५० हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात ८० हजार रुपये मिळू शकतील. आताच्या काळात कोणत्याही हमीशिवाय असे कर्ज मिळणे अशक्य आहे, म्हणूनच जास्तीत जास्त फेरीवाल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अभिजीत बांगर यांनी केले.
प्रत्येक प्रभाग समितीतून किमान २ हजार अर्ज यावेत, तसेच यापूर्वी नाकारण्यात आलेल्या अर्जांचाही(applications) पुनर्विचार करावा. यापूर्वी बँकांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज फेटाळले होते. मात्र, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत सूचना दिल्यानंतर बदललेल्या नियमांमुळे आता जुन्या अर्जातील काहीजण पात्र ठरू शकतील, असेही अभिजीत बांगर यांनी नमूद केले.
बँकांनी(banks) कोणतीही जास्तीची कागदपत्रे, स्टॅम्प पेपर मागू नयेत. महापालिकेकडून कागदपत्रांची पडताळणी करून लेटर ऑफ रेकमेंडशन आले की ते स्वीकारले जावे, हे राज्यस्तरीय बँकिंग कमिटीने स्पष्ट केले आहे. त्याचा पुनरुच्चार पीएम स्वनिधी योजनेचे ठाण्याचे लीड मॅनेजर भारती यांनी केला.

बँकांनी अधिक संवेदनशील व्हावे : आयुक्त
पीएम स्वनिधी योजनेबद्दल महापालिका युद्धपातळीवर काम करते आहे. दररोज लक्ष्याच्या तुलनेत कामगिरीचा आढावा घेतला जातो आहे. यात, काही प्रमाणात बँकांकडून अडथळे येत असल्याच्या तक्रारी येत आहेत, त्यामुळे बँकांनी संवेदनशीलपणे काम करावे. सगळ्यांनी एकत्र येऊन करण्याचा हा उपक्रम आहे. केंद्र सरकारने ठरवून दिलेल्यापेक्षा कोणतीही अधिक कागदपत्रे बँकांनी मागू नयेत. तसेच, फेरीवाल्यांचे शून्य शिल्लक खाते विनाअडथळा उघडले जावे, असे अभिजीत बांगर(आयुक्त, ठाणे महानगरपालिका) यांनी म्हटले.


