
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्र्वादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. या टिकेनंतर सर्वच स्तरातून याचा विरोध झाला. मात्र, आता खुद्द सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनीही याबाबत ट्वीट करीत प्रतिक्रिया दिली आहे. अशी वक्तव्ये करणे महाराष्ट्राची संस्कृती नाही. महिलांचा सन्मान जपला पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले, याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली, कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे बोलणे-वागणे ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.
परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही, तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या, ही बाब आश्वासक(reassuring) आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे.
मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल, म्हणून आपण अस्वस्थ होणे स्वाभाविक असले, तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकुयात आणि महाराष्ट्राची(Maharashtra) जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले.
याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले, याबद्दल मी मन:पूर्वक कृतज्ञता व्यक्त करते, असेही त्यांनी म्हटले.


