
Indiagroundreport वार्ताहर
पुणे : अवकाळी पावसाने सर्व प्रकारच्या पिकांना फटका बसला असून, सध्या बाजारांमध्ये खाद्यान्न वस्तूंचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेले आहेत. त्यातच सरकारने खाद्यान्न वस्तूंवर पाच टक्के दराने वस्तू आणि सेवा कर(GST) लावल्याने महागाईत भर पडली आहे. महागाई कमी करण्यासाठी सरकारने खाद्यान्नांवरील जीएसटीचे दर कमी करावेत, अशी मागणी दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे अध्यक्ष वालचंद संचेती यांनी केली आहे.
खाद्यान्नावरील जीएसटी दर पाच टक्क्यांवरून कमी करून ते दोन टक्के इतके आकारावे, तसेच सध्या बाजार सेस असलेला एक रुपया शेकडा दर कमी करून तो २५ पैसे करावा, अशी आग्रहाची मागणी करणारे पत्र संचेती यांनी प्रधानमंत्री(Prime Minister), केंद्रीय अर्थमंत्री, खासदार आणि मुख्यमंत्री यांना पाठविले आहे. भारतातील सर्व व्यापारी संघटनांनी अशा स्वरूपाचे पत्र सरकारकडे द्यावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी कळविले आहे.


