
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा केल्या जातात. राज्यात दोन लाख कोटींचे प्रकल्प दिल्याची माहिती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. याच मुद्यावरुन उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
महाराष्ट्राला(Maharashtra) तुम्ही काय उल्लू समजले आहे का?, जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच हे सरकार त्या राज्याचा विचार करते. निवडणुका लक्षात ठेवून कामे केली जातात. अचानक प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्राबद्दल प्रेम आले आहे. 2 लाख कोटींचे प्रकल्प म्हणजे जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्राकडे दिले आहे. हा फुगा फुटण्याआधी निवडणुका होतील, असा आमचा अंदाज आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
जे उद्योग येणार होते ते पळवून नेले आणि जे नाहीत त्यांची घोषणा केली. मात्र, यावरुन स्पष्ट होत आहे की, निवडणुका जवळ आहेत, म्हणून मी सांगितले की, मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा. मी काही ज्योतिष(astrologer) नाही, मात्र निवडणुका आल्या की घोषणा सुरु होतात, त्यामुळे राज्यातही मध्यावधीसाठी तयार राहण्याच्या मी सूचना दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
माजी राज्यमंत्री व माजी खासदार रमेश दुबे यांच्या आत्मचरित्र ‘मेरी अमृत यात्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन आज वांद्रे पूर्व येथील उत्तर भारतीय संघाच्या सभागृहात पार पडले. तिथे उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


