
Indiagroundreport वार्ताहर
ठाणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’मुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून, त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी शनिवारी व्यक्त केले.
ठाणे जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासादरम्यान ते ठाणे येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक व भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष आ. निरंजन डावखरे उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’वर त्या पक्षातील नेत्यांचा कब्जा आहे. ते कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांना भेटू देत नाहीत. परिणामी या यात्रेमुळे त्यांचा पक्ष वाढण्याच्या ऐवजी कमकुवत होत आहे. अन्य पक्षातील नेते–कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत नाहीत, उलट काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. नंदूरबारच्या(Nandurbar) काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केला. २०२४ ची आगामी निवडणूक येईपर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करतील.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भाजप आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षासोबत युती करून लढवेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अफाट लोकप्रियता, त्यांच्या सरकारचे काम, राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारचे काम आणि पक्षाच्या संघटनात्मक ताकदीच्या जोरावर आम्ही यश मिळवू. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात ४८ पैकी किमान ४५ जागा व विधानसभा निवडणुकीत किमान २०० जागांवर आम्ही यशस्वी होऊ. आमच्या विरोधात तीनही पक्ष एकत्र आले तरी आम्ही विजय मिळवू.
महाविकास आघाडी ही वैचारिक आधारावर नव्हे, तर केवळ भाजपला दूर ठेऊन सत्ता मिळविण्यासाठी निर्माण झाली, पण विचार सोडल्यामुळे आता पारंपरिक मतदार दुरावण्याच्या भीतीने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) हे शिवसेनेवर टीका करीत आहेत, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हटले.


