
राज म्हणाले “अरे गधड्या तुझी लायकी…”
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी राहुल गांधी यांच्यावर खरपूस शब्दांत टीका केली. राहुल गांधी हे गुळगुळीत मेंदूचे आहेत. सावरकरांविषयी बोलायची त्यांची लायकी आहे का?, असे राज ठाकरे म्हणाले. ते आज(२७ नोव्हेंबर) मुंबईत मनसेच्या गटप्रमुखांना संबोधित करीत होते.
‘भारत जोडो यात्रे’दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली असे राहुल राहुल गांधी म्हणाले होते. त्यांच्या याच विधानामुळे मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला होता. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात आंदोलन केले होते.
“महापुरुषांची बदनामी केली जात आहे. त्यादिवशी राहुल गांधी(Rahul Gandhi) महाराष्ट्रात आले होते. ते गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की त्यांच्या मागे आर. डी. बर्मन बोलतात हेच समजत नाही. अरे गधड्या सावरकरांबद्दल बोलायची तुझी लायकी आहे का?, सावरकर यांना कोठे ठेवले होते, त्यांनी काय हालअपेष्टा सहन केल्या, याची कल्पनातरी आहे का?” असा सवाल राज ठाकरे यांनी केला.
“सावरकरांनी माफी मागितली असे राहुल गांधी म्हणतात. स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट असते. आपण त्याचा कधीच विचार करणार नाही. आपण फक्त दयेचा अर्ज केला, असे म्हणणार. तुरुंगात ५० वर्षे सडत बसण्यापेक्षा यांच्याशी खोटं बोलून बाहेर येतो. बाहेर येऊन परत हंगामा करतो, असा सावरकरांचा विचार होता. याला स्ट्रॅटेजी म्हणतात, असे राज ठाकरे म्हणाले.
“एखादी चांगली गोष्टी घडणार असेल तर खोटे बोलावे, हे कृष्णनीतीमध्ये सांगितलेले आहे. शिवरायांनी मिर्झाराजे जयसिंगाला गड-किल्ले दिले. गड-किल्ले म्हणजे चितळेची बर्फी होती का? त्यावेळी मावळे थकलेले होते. आर्थिक अडचणी होत्या. त्यामुळे समोरून येत असलेल्या सैन्याला तोंड देणे शक्य नव्हते. गडकिल्ले फक्त लिहून द्यायचे होते. परिस्थिती निवळली की ते परत घेऊ, याला ‘स्ट्रॅटेजी’ म्हणतात. हे ज्याला समजत नाही, तो गुळगुळीत मेंदूचा आहे,” असेही राज ठाकरे म्हणाले.
तसेच, या सर्व गोष्टी थांबणे गरजेचे आहे. भाजप(BJP) आणि काँग्रेस(Congress) असे दोघांनाही हे सगळे थांबवावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी यावेळी केले.


