
Indiagroundreport वार्ताहर
कोल्हापूर : गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडल्यानंतर कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील गुळाचे दर(Jaggery prices) वाढले आहेत. प्रति क्विंटल सरासरी ५०० रुपये दरात वाढ झाली आहे.
कोल्हापूरच्या गुळाला देश-विदेशात मागणी असते. यावर्षी गूळ हंगाम सुरू झाला तेव्हा प्रतिक्विंटल ५१०० रुपये असणारा दर गेल्या आठवड्यात ३२०० रुपये इतका कमी झाला होता. त्यावर गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी गूळ उत्पादन खर्चाचा विचार करून प्रतिक्विंटल ३७०० रुपये दर मिळावा, अशी मागणी करून बाजार समितीतील गूळ सौदे बंद पाडणारे आंदोलन केले होते. गेले तीन दिवस गूळ बाजारपेठ(jaggery market) ठप्प झाली होती.
दरम्यान, गूळ उत्पादकांची मागणी लक्षात घेऊन गूळ खरेदी दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. प्रतवारीनुसार, गुळाला ३३०० ते ४२०० रुपये असा दर मिळत आहे. सरासरी पाचशे रुपये दर वाढ झाली असल्याने विक्रीसाठी गूळ आणल्याने आज बाजार समितीतील वर्दळ वाढली होती. कोल्हापुरातून(Kolhapur) गुळाची मागणीही वाढत चालली आहे. कोल्हापूर बाजार समितीमध्ये शनिवारी ३० किलोचे १३,९७२ रव्यांची आवक झाली, तर ४८ हजार ८६७ रव्यांची विक्री झाली. १३१७ रवे शिल्लक राहिले, असे बजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांनी सांगितले.


