
यात पुणे विभाग अव्वलस्थानी; 932 सरकारी नोकरदार जाळ्यात!
मुकुंद लांडगे
पुणे : (Pune) राज्यभरात मुंबई, ठाणे, पुणे(Pune), नाशिक, नागपूर, अमरावती व नांदेड असे आठ विभाग आहेत. त्यातील पुणे विभागात यंदा सर्वाधिक लाच प्रकरणाचे गुन्हे दाखल झाले आहेत. १ जानेवारी ते ६ नोव्हेंबर या काळातील तब्बल ६४७ गुन्हे दाखल होऊन ९३२ जण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.
राज्याच्या अखत्यारीतील महसूल, पोलीस, शिक्षण, म्हाडा(MHADA), महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका असे अनेक विभाग अव्वल आहेत. या विभागांत अडलेल्या नागरिकांचा थेट संपर्क लोकसेवक यांच्याशी येत असतो, त्यामुळे याच विभागात लाच घेण्याचे प्रकार वाढले असल्याचे पोलीस सांगतात. विशेष म्हणजे नागरिकांची अडलेली कामे करून देण्याचा कालावधी ३० ते ९० दिवस म्हणजेच १ ते ३ महिन्यांचा असतानाही जाणीवपूर्वक कामात त्रुटी काढून ‘चर्चा करा’ असा शेरा मारला जातो. तर, दुसरीकडे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतानाही पैशांची मागणी केली जाते, तरीही याबाबत जास्त वाच्यता न करता काहीजण याला बळी पडतात. तर, अनेकजण पुढे येऊन अशा लोकसेवकांच्या विरोधात तक्रारी करतात. त्यातूनच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचून कारवाई केली जाते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोकांना तक्रारीसाठी पुढे या, नक्की लाच घेणे थांबेल असे आवाहन केले आहे.
दरम्यान, अधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे(Anti-Corruption Department) फेसबूक पेज(लाँच कंम्पलेंट) असून, त्यावर थेट तक्रार करता येते. तसेच १०६४ या टोल फ्री क्रमांकावरही तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, तर यासाठी तक्रारीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संकेतस्थळही आहे.
राज्यात पुणे अव्वल
राज्यात लाच घेण्यात पुणे विभाग अव्वल असून, तेथे गेल्या १० महिन्यांत सर्वाधिक १३४ गुन्हे दाखल झाले आहेत, तर नाशिक विभागात(Nashik division) १०७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लाच प्रकरणात ६२९ सापळे, तर अपसंपदाचे सात गुन्हे दाखल आहेत. महसूल विभागात १५३, पोलीस १३९, तर महापालिका, जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागात ७० प्रकरणे असल्याचे सांगण्यात आले आहे.


