
Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : महाराष्ट्राला(Maharashtra) ‘टॅक्स इंडिया ऑनलाईन(टीआयओएल)’चा जुरी पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. येथील ताज पॅलेसमध्ये दिमाखदार सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार तामिळनाडू राज्याचे वित्तमंत्री पलानीवेल त्यागराजन यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.
जीएसटीचे(GST) विशेष आयुक्त अनिल भंडारी, संयुक्त आयुक्त जी. श्रीकांत, स्वाती काळे, संजय निकम, पोपळघाट यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुंबई आणि पुणे झोनला यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यसभा सदस्य सुशील मोदी, पंजाबचे माजी अर्थमंत्री मनप्रीत सिंग बादल, सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम्सच्या माजी अध्यक्ष प्रवीण महाजन या मंचावर उपस्थित होते. तसेच, देशभरातील विविध नामवंत संस्थेचे प्रमुख सभागृहात उपस्थित होते.
महाराष्ट्र कर संकलनाच्या(tax collection) बाबतीत नेहमीच पहिले राज्य राहिलेले आहे. मागील वित्तीय वर्षात दोन लाख 18 हजार कर संकलन करून महाराष्ट्राने देशाच्या कर संकलनात जवळपास पंधरा टक्के योगदान दिले आहे. तसेच, वर्ष 2022-23 मध्ये आत्तापर्यंत एक लाख 55 हजार विक्रमी कर संकलन केले आहे.
इज ऑफ डूइंग बिजनेस(Ease of doing business) मध्ये महाराष्ट्राचा जीएसटी विभाग नेहमीच अग्रेसर राहिला आहे. महाराष्ट्रात रिफंड प्रक्रिया नेहमी वेळेवर आणि जलदगतीने होते. व्यापाऱ्यांची नोंदणीही सुलभ आणि वेळच्या वेळी होत असल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळतो. प्रामाणिक व्यापाऱ्याला महाराष्ट्र जीएसटी विभागातर्फे नेहमीच मदत केली जात असून, योग्य सेवा जलद गतीने पुरविल्या जातात. बहुतांशी सर्व सेवा-सुविधा जसे नोंदणी, दुरुस्त्या, परतावा(रिफंड) आता ऑनलाईन झालेले आहे.
महाराष्ट्र जीएसटी विभागात व्यापाऱ्याच्या तक्रारीची ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली व वास्तविक वेळेच्या आधारावर(Grievance redresses online and on real time basis) ताबडतोब दखल घेतली जाते. महाराष्ट्र शासनाने अमलात आणलेली अभय योजना एक यशस्वी योजना म्हणून गणली गेली असून, प्राप्त झालेले एकूण दोन लाख अठरा हजार चारशे सहा अर्ज निकाली काढण्यात आले.


