
Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : भारताच्या विकासासाठी एका अंबानी आणि अदानीने काही होणार नाही, त्यासाठी देशात १० हजार अंबानी आणि २० हजार अदानी तयार झाले पाहिजेत. भारताने जी-२० परिषदेच्या संधीचा उपयोग देशाला प्रगतीसाठी करावा. ही संधी पुन्हा कधीच मिळणार नाही, असे प्रतिपादन भारताचे जी-२० परिषदेचे सदस्य आणि निती आयोगाचे माजी साईओ अमिताभ कांत(Amitabh Kant) यांनी व्यक्त केले.
जी-२०(G-20) परिषदेचे अध्यक्षपद यंदा भारताकडे आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्याहस्ते आज जी-२० परिषदेच्या अधिकृत चिन्हाचे पदार्पण करण्यात आले. तेव्हा जी-२० परिषदेचे अधिकारी आणि उद्योगपती यांच्याशी अमिताभ कांत यांनी संवाद साधला. जी-२० परिषदेचे भारताकडे असलेले अध्यक्षपद हे उद्योगपतींशी संवाद साधण्याची मोठी संधी आहे, असेही अमिताभ कांत यांनी यावेळी नमूद केले.
जागतिक पुरवठा साखळीचा भाग बनण्याची ही संधी आहे. भारताला अव्वलदर्जाचे उत्पादन करणारे राष्ट्र बनवायचे असेल, तर उद्योग(industries) वाढले पाहिजेत. प्रगतीशिवाय भारताचा विकास होऊ शकत नाही. जागतिक आव्हानांत भारताने जी-२० परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. प्रभावी कृतीने प्रत्येक आव्हान आम्ही संधीत बदलू शकतो, असेही अमिताभ कांत यांनी म्हटले.


