
Indiagroundreport वार्ताहर
नांदेड : (Nanded) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ‘भारत जोडो’ यात्रा सोमवारी रात्री महाराष्ट्रात दाखल झाली. दरम्यान काँग्रेसचे नेते, सेवादलाचे समन्वयक कृष्णकुमार पांडे यांचे देगलूरला(Degalur) हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
कृष्णकुमार पांडे(Krishnakumar Pandey) हे झेंडा तुकडीच्या संचलनाचे प्रमुख होते. यात्रेत चालत असताना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यानंतर तातडीने त्यांना रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने भारत जोडो यात्रेवर शोककळा पसरली.
यात्रेच्या कॅम्पमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, दिग्विजय सिंह, सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई, एच. के. पाटील, नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली वाहली. पांडे हे नागपूर येथील आहेत. त्यांच्या निधनावर यात्रेत सहभागी असलेल्या अनेक काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी ट्विट करीत शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, कांग्रेस सेवादलाचे महासचिव कृष्णकुमार पांडे यांचे निधन संपूर्ण कॉंग्रेस परिवारासाठी दु:खद घटना आहे. त्यांच्या परिवार आणि प्रियजनांप्रती मी आपल्या संवेदना व्यक्त करतो. यात्रेदरम्यान त्यांनी आपल्या हातात तिरंगा धरला होता. देशाप्रती त्यांचे समर्पण नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहील.
राज्यात एकूण १४ दिवस चालणारी ही यात्रा नांदेड, हिंगोली(Hingoli), वाशीम, अकोला आणि बुलढाणा अशा पाच जिल्ह्यांतून तब्बल ३८४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे.


