
पालिकेला गंध नाही
गर्दी वगळून सकाळी कारवाई केल्याचा आरोप
मुंबई : (Mumbai) घाटकोपर पश्चिमेकडील खोत गल्लीत आज सकाळपासून दुपारपर्यंत पोलिसांनी फेरीवाल्यांवर केलेली कारवाई चांगलीच चर्चेत आली आहे. ही कारवाई करण्यासाठी एकही पालिका कर्मचारी आणि अधिकारी नसून, फक्त पोलिसांनीच केल्याने याबाबत चर्चेला उधाण आले आहे. तर दुसरीकडे ही कारवाई करताना पालिकेला याचा गांधही नव्हता. विशेष म्हणजे ही कारवाई ऐन गर्दीच्या वेळी म्हणजेच सायंकाळी न करता सकाळी कोणीही नसताना करण्यात आल्याने याबाबत वेगवेगळे आरोप होत आहेत.
घाटकोपर पश्चिम येथील रस्त्यांवर फेरीवाल्यांमुळे एकीकडे नागरिकांना धड चालताही येत नाही तर दुसरीकडे रिक्षांनाही ये जा करता येत नाही यासाठी मनसेच्या वतीने कल पालिकेचे घाटकोपर येथील एन विभागाचे सहायक पालिका आयुक्त तसेच घाटकोपर पोलिसांना संयुक्त कारवाई करण्याची मागणी केली होती. कारवाई न झाल्यास उग्र आंदोलनचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी आजची ही कारवाई पालिकेला विश्वासात न घेताच घाई घाईत उरकल्याचा आरोप नागरिकांनी याबाबत बोलताना केला आहे.
दरम्यान, आजच्या या पोलीस कारवाईसाठी घाटकोपर पोलीस ठाण्याचे अधिकारी डाके यांच्यासह इतरही जवळपास १५ ते २० गणवेशातील आणि सध्या वेशातील पोलीस उपस्थित होते. यावेळी डाके यांनी ही कारवाई फक्त पोलिसांनी केली असून, पालिकेचे कर्मचारी नाहीत असे सांगितले. घाटकोपर पश्चिमेकडील सर्व रस्त्यांवरील फेरीवाले हे सायंकाळी तसेच रात्री उशिरापर्यंत आपले बस्तान बसवत असल्याने नागरिकांना चालणे अवघड झाले आहे असे नागरिक सांगत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांना ही कारवाई करायचीच होती तर सायंकाळच्या वेळी का केली नाही असाही सवाल याबाबत बोलताना नागरिकांनी केला आहे.
पोलीस आणि पालिका अधिकारी यांच्यात ताळमेळ नाही
या पोलिसी कारवाईदरम्यान पालिका अधिकारी आणि पोलीस यांच्यात ताळमेळ नसल्याचे उघड झाले असून, याबाबत पालिकेचे एन विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त संजय सोनवणे हे अनभिज्ञ आहेत. त्यांनी याबाबत सांगितले की, मला याबाबत माहिती नाही. मी माहिती घेतो. तर याबाबत घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय डहाके यांच्याशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी आपला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या दोन्ही यंत्रणात समन्वय नसल्याचे यानिमित्ताने समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


