spot_img
HomeUncategorizedShirdi : फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात धर्मांध शक्तींना थारा नाही : छगन...

Shirdi : फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात धर्मांध शक्तींना थारा नाही : छगन भुजबळ

Indiagroundreport वार्ताहर
शिर्डी : फुले, शाहु, आंबेडकरांच्या(Phule, Shahu and Dr. Babasaheb Ambedkar) राज्यात धार्मिक द्वेषाचे राजकारण काही मंडळी करु पाहत आहेत, पण ते विसरतात की, धर्मांध सत्तेच्या विरोधात उभे राहण्याची ताकद फुले-शाहू-आंबेडकरच आम्हाला देतात. धर्मांध पक्षाशी लढा हा विकासाच्या मुद्दावरुनच करावा लागेल. आपण विकासाचे राजकारण करतो, पण देशात सध्या काय चालु आहे याचा विचार करीत आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने आपल्याला तयार राहावे लागणार आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ हे दोन दिवसीय कार्यकर्ता शिबीर शिर्डी(Shirdi) येथे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे खासदार, आमदार, माजी मंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) म्हणाले की, कपाळावर टिकली किवा कुंकू असेल तरच प्रश्न विचार असे वक्तव्य मनोहर भिडे यांनी केले. केवळ चक्र उलटे फिरविण्यासाठी, मनुवादाला पुन्हा चालना देण्यासाठी हा प्रयत्न होत आहे. ज्या सावित्रीमाई यांच्या कपाळावर भले मोठे कुंकू असताना महिलांच्या शिक्षणासाठी काम करीत असताना देखील त्यांना दगड, धोंडे, शेण फेकून मारले. त्यामुळे अश्या मनुवृतीच्या लोकांचा आपण निषेध केलाच पाहिजे. तसेच छत्रपती, फुले, शाहू व आंबडेकरांचे समतावादी विचारांचे अनुकरण करतो, त्यामुळे कुठल्याही धर्मांध शक्तींना थारा दिला जाणार नाही.

ते पुढे म्हणाले की, देशात वाढती महागाई, बेरोजगारी, गॅसचे दर, पेट्रोलचे दर, अर्थव्यवस्थेची लागलेली वाट, कोळसा संकट, वाढते खाद्यतेल दर या सगळ्या वरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जाणून-बुजून तुमच्या समोर वेगळे मुद्दे आणले जात आहेत. जेव्हा केंद्रात आघाडी सरकार होते, तेव्हा महगाईचा दर हा ४.७ % टक्के होता. आज हा दर १४.५५ % टक्के एव्हढा वाढलाय की तुमच्या घरात तुम्हाला रोज लागणाऱ्या सगळ्या वस्तुंच्या किमती ह्या २०० ते ३०० टक्क्यांनी वाढल्या आहेत. आत्ताच दिवाळी पार पडली मात्र कितीतरी लोकांच्या घरात खायला अन्नदेखील नव्हते. शेतकऱ्यांवर पावसामुळे मोठे संकट ओढाविले, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची मदत हे सरकार देत नाही. महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आ वासून उभे असताना नोटेवर कोणाचा फोटो? याचीच चर्चा जास्त.

सत्य परिस्थितीवर बोलले तर भाजपच्या यंत्रणा कामाला लागतात आणि मग घरी केंद्र सरकारच्या यंत्रणा येऊन पोहचतात, पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अडचणीत आलेल्या कार्यकर्त्याच्या मागे पक्ष कायम ठामपणे उभा राहतो. ईडीने(ED) कारवाई केल्यानंतर जामीन लवकर मिळत नाही. मालमत्तेवरील जप्ती, लवकर मुक्त होत नाही आणि वर्षानुवर्षे केस बंद होत नाही. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या कारवाया या फक्त भाजप सोडून इतर पक्षातील नेत्यांवरच होत आहेत. या केंद्रीय यंत्रणेमुळे अडचणीत असलेल्या कार्यकर्त्यांना शरद पवार कधीही एकटे सोडत नाही. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्या पाठिशी कायमच शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा राहिलेला आहे आणि येथून पुढे देखील राहील, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या(ST Corporation employees) आंदोलनावरून आमच्यावर टीका केली गेली. महाविकास आघाडी सरकार असताना विलनीकरणाची मागणी केली गेली, आंदोलन केले गेले, एव्हढेच नाही तर शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. आता त्या मागणीचे झाले काय? आता का एसटीचे विलनीकरण केले जात नाही…? असा सवाल उपस्थित करीत केवळ शरद पवार यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असे छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटले.

एका मागून एक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रखडविला जात आहे. राज्य सरकारने या रेल्वे मार्गासाठी २०% वाटा उचलण्याला मंजुरी दिली होती. राज्य सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या भागीदारीतून ‘महारेल’ या स्वतंत्र कंपनीची निर्मिती करण्यात आली. हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर गेल्या ६ महिन्यांपासून हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. आता रेल्वे मंत्रालयाला अचानक हा प्रकल्प योग्य नसल्याचा साक्षात्कार झाला. वेगवेगळ्या मंजुऱ्यांसाठी ५ वर्षांचा कालावधी गेला. एवढे दिवस रेल्वे मंत्रालय झोपले होते का?, असा सवाल उपस्थित करीत महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात होणारे हे प्रकल्प होऊ देत नाही आणि अहमदाबाद- मुंबई बुलेट ट्रेनच्या मागे लागलेला आहात, ज्याचा फायदा महाराष्ट्राला(Maharashtra) काहीच नाही, असेही त्यांनी म्हटले.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, वेदांता-फॉक्सकॉन सारखा एक मोठा प्रकल्प गुजरातला पळविला गेला. तेव्हा यापेक्षा मोठा प्रकल्प आणू असे म्हणणाऱ्यांनी अजून एकही प्रकल्प महाराष्ट्रात आणला नाही. या उलट फॉक्सकॉर्न पाठोपाठ आता टाटा एअरबसचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. आधीचा १ लाख ५४ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प आणि टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला दिवाळी गिफ्ट म्हणून देण्यात आला. महाराष्ट्रातले रोजगार, तुमच्या हक्काचे रोजगार गुजरातला पळविले जात आहेत. मी स्वत: त्यासाठी रतन टाटा यांना पत्र लिहिले होते की, तुम्हाला सर्व सुविधा देऊ महाराष्ट्रात आणि या नाशिकमध्ये प्रकल्प घेऊन, या एचएलएलच्या सोबत, या एअरबसचे उत्पादन करा, त्यासाठी तुम्हाला सर्वोत्तोपरी सहकार्य केले जाईल. मात्र, तो प्रकल्प गुजरातला गेला. विमान दुरुस्त करणारा ‘सॅफ्रन’चा प्रकल्प देखील हैदराबादला(Hyderabad) गेला. आमचे दोन अडीच लाख कोटींचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला केवळ २ हजार कोटींचा प्रोजेक्ट दिला. हे म्हणजे त्यांनी गुजरातला फॉक्सकॉर्न दिला, मात्र महाराष्ट्राला पॉपकॉर्न दिला.

ते पुढे म्हणाले की, मोठमोठे प्रकल्प गुजरातला आणि प्रदूषणाचे प्रकल्प महाराष्ट्राला हा कोणता न्याय? महाराष्ट्रातून डायमंड मार्केट सूरतला, कपडा मार्केट सूरतला, बेलापूरचे रासायनिक कारखाने दहेजला, आयटी हब अहमदाबादला, टाईल्स व्यवसाय वापीला, मुंबई बंदराची जहाजे वळली कच्छच्या अदानी पोर्टला, जलदगतीने अजून व्यवसाय गुजरातला नेण्यासाठी बुलेट ट्रेन ज्यांचा अधिक खर्च महाराष्ट्रावर आहे. नाशिकमधील उद्योग व्यावसायिक हे सातत्याने विकासाची कास धरत आहेत. मुंबई-पुणे-नाशिक हा सुवर्ण त्रिकोण मानला जातो. त्यात औरंगाबाद जोडून सुवर्ण चतुष्कोण मानला जातो. मात्र, चौकोनातील एक कोण कायम कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातोय. नाशिकच्या अलायन्स एयरलाईन्स ही विमान कंपनी केंद्राच्या उडान प्रकल्पाअंतर्गत नाशिकमध्ये(Nashik) काम करीत होती. ती उडानची स्कीम संपली, मात्र कंपनीला चांगला फायदा होत होता. नाशिक आणि आजूबाजूच्या शहरांची लोक याचा फायदा घेत होते, मात्र तरी या कंपनीला गुजरातमध्ये जाण्यास भाग पडले.

ते पुढे म्हणाले की, जीएसटी संदर्भातील बातमी आली. १.५० लाख कोटी अर्थसंकलन झाले, त्यात सर्वात मोठा वाटा हा महाराष्ट्राचा आहे. २३ हजार कोटी रुपये महाराष्ट्र देतो आणि गुजरात फक्त ९ हजार कोटी तरी महाराष्ट्राच्या बाबतीत एव्हढा दुजाभाव का?, असा सवाल उपस्थित करीत महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राला कमजोर करण्याचे हे प्रयत्न आहेत, मात्र महाराष्ट्र कमजोर होणार नाही.

तसेच छगन भुजबळ यांनी ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार या भारताचा’ या पंक्तीतून विरोधकांना इशारा दिला.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने हाहाकार केल्याने शेतकरी पूर्णत: कोसळून गेला आहे. विशेष करून पिके तोंडाला आलेली असतानाच ऑक्टोबरच्या पावसाने पार वाताहत केली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र सध्याच्या सरकारला याकडे पहायला वेळ नाही. शेतकऱ्यांसाठी वेळ नाही फक्त ‘दहीहंडी’ आणि ‘गणपती’ साजरे करण्यात पुढे असणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांना एकरी ५० हजार मदत द्या ही मागणी भाजपचे नेते करीत होते, आता सत्ता आली तर ते आश्वासन विसरले. राज्यात कृषी मंत्री अब्दुल सत्तार(Abdul Sattar) हे दौऱ्यावर जातात आणि जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात की तुम्ही दारू पिता का..? यावर आम्ही मात्र शांत राहणार नाही. येणाऱ्या अधिवेशनात या सरकारला धारेवर धरल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही.

छगन भुजबळ म्हणाले की, तिकडे युक्रेनमध्ये जनतेने निवडून दिलेल्या प्रधानमंत्री लिज ट्रुस यांनी लोकांना दिलेली आश्वासने पाळु शकलो नाही, म्हणून अवघ्या ४५ दिवसात राजीनामा दिला. आमच्याकडे ८ वर्षे झालीत, लोक अजूनही १५ लाखांची वाट पहात आहेत. आपण आता कामाला लागले पाहिजे, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला महाराष्ट्रात पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार राज्यात आणायचे आहे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर