
Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड(D. Y. Chandrachud) यांनी भारताचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे. राष्ट्रपती(President) द्रोपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. आज(९ नोव्हेंबर) राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. मावळते सरन्यायाधीश उदय लळित यांच्याकडून लवकरच धनंजय चंद्रचूड हे पदभार स्वीकारतील. आगामी दोन वर्षे सरन्यायाधीश(Chief Justice) म्हणून ते न्यायदानाचे काम करतील.
न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांना जून 1998 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्त केले होते आणि त्याचवर्षी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 29 मार्च 2000 ते 31 ऑक्टोबर 2013 या कालावधीत ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. डी. वाय. चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. धनंजय यशवंत चंद्रचूड असे त्यांचे पूर्ण नाव आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठातून वकिलीचे शिक्षण घेतले आहे. यानंतर त्यांनी प्रतिष्ठित इनलॅक्स स्कॉलरशिपच्या मदतीने हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण घेतले. हार्वर्डमध्ये(Harvard) त्यांनी लॉ इन मास्टर्स आणि फॉरेन्सिक सायन्स मध्ये डॉक्टरेट पूर्ण केले.
पुण्यातील(Pune) कन्हेरसर हे चंद्रचूड यांचे मूळ गाव आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड हे 1978 ते 1985 या काळात भारताचे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड तब्बल सात वर्षे चार महिने इतका सर्वाधिक काळ सरन्यायाधीशपदावर राहिले.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड 29 मार्च ते 31 ऑक्टोबर 2013 या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, त्यानंतर त्यांची नियुक्ती अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून करण्यात आली होती. 2018 मध्ये धनंजय चंद्रचूड यांनी व्याभिचाराला गुन्हा मानणाऱ्या कायद्याला रद्द केले होते. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने निर्णय दिला, त्यापैकी एक डी. वाय. चंद्रचूड होते.


