spot_img

MUMBAI : मुंबईचा कायापालट करण्यासाठी ‘माझी मुंबई स्वच्छ मुंबई अभियान’

शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भागधारकांशी केली सल्लामसलत

मुंबई : माझी मुंबई स्वच्छ मुंबई अभियानामध्ये सहभाग घेणे म्हणजे जणू आपल्या मातृभूमीचे ऋण फेडायची संधी आहे, या भावनेने सर्वांनी काम करावे. हे अभियान मुंबई महानगराचा कायापालट करण्यासाठी राबवावयाचे आहे. अभियानामध्ये बक्षीस मिळो ना मिळो, मात्र त्यानंतर सर्वांनी एकदिलाने मुंबईच्या स्वच्छतेसाठी कृती करावी, यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावयाचे आहेत, असे उद्गार राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काढले.

मुंबई महानगरात दिनांक १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान माझी मुंबई – स्वच्छ मुंबई हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये भागधारकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निर्देशानुसार बैठक आयोजित केली होती, त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन केसरकर हे बोलत होते. आमदार अमीन पटेल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, माजी सनदी अधिकारी गिरीश गोखले, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, उपायुक्त (परिमंडळ २) रमाकांत बिरादार, मुंबई फर्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेवील मेहता व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना पालकमंत्री केसरकर म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वच्छता महत्त्वाची असते. सरकारी यंत्रणेमध्ये प्रचंड शक्ती असते आणि ही यंत्रणा स्वच्छता अभियान राबवेलच, मात्र त्यासोबत नागरिकांचाही त्यामध्ये सहभाग असला पाहिजे, कारण स्वच्छता राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. मुंबई महानगराचा कायापालट करण्यासाठी दिनांक १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान माझी मुंबई – स्वच्छ मुंबई या विशेष अभियानाची अंमलबजावणी करावयाची आहे. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रं येणं हे महत्त्वाचं पाऊल आहे. या अभियानामध्ये सर्व भागधारकांनी सहभागी व्हावे आणि सर्व मुंबईकरांना देखील सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करावे. मोहिमेतून विजेत्यांना बक्षीस मिळेलच, मात्र बक्षिसानंतरही अभियान न थांबवता त्याचा कायमस्वरुपी अंगीकार होण्यासाठी प्रयत्न करणे, हा खरा उद्देश आहे. त्यादिशेने सर्वांनी मिळून काम करुया, असे आवाहन केसरकर यांनी केले.

याप्रसंगी इतर मान्यवरांची देखील समयोचित भाषणे झाली. तसेच विविध सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, व्यावसायिकांच्या संघटना यांच्या प्रतिनिधींनी पालकमंत्री महोदयांसमोर निरनिराळ्या सूचना, उपाययोजना मांडल्या. त्यांचा योग्यरितीने स्वीकार करुन अभियानामध्ये समावेश करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी आश्वस्त केले.

प्रास्ताविक करताना उपआयुक्त चंदा जाधव यांनी अभियानाचे स्वरुप विशद केले.

Explore our articles