Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र ऋषिकेश देशमुख(Hrishikesh Deshmukh) यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला आहे. तपास यंत्रणांनी समन्स पाठविल्यानंतर ऋषिकेश देशमुख कधीही ईडीसमोर हजर झाले नाहीत.
ऋषिकेश देशमुख मनी लाँड्रिंग(money laundering) प्रकरणात सहभागी असल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. याबाबत ईडीचे आरोप आहेत की, ऋषिकेश देशमुख यांनी चुकीच्या पद्धतीने कमावलेले पैसे कायदेशीर देणगी म्हणून दाखविले होते आणि वडील अनिल देशमुख यांचीही मदत घेतली होती.
ऋषिकेशला जामीन मंजूर झाल्यास त्याच्याकडून या प्रकरणातील पुरावे प्रभावित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना जामीन मंजूर करू नये, अशी विनंती ईडीने न्यायालयाकडे केली होती. ऋषिकेश तपासाला सहकार्य करीत नाहीत, असा आरोप ईडीने केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप केले होते. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी वसुलीचे आदेश दिले होते. या आरोपांची सीबीआय आणि ईडी तपास करीत आहे. या प्रकरणात ऋषिकेश देशमुख देखील सक्रीय असल्याचा आरोप आहे. अनिल देशमुख सध्या या प्रकरणात तुरुंगात आहेत.
अनिल देशमुख यांना या प्रकरणात 4 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, त्यांना त्यानंतरही तुंरुगात रहावे लागत आहे, कारण ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला होता. मात्र, सीबीआयने(CBI) दाखल केलेल्या प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मंजूर झालेला नाही.