
दिल्ली, उत्तर प्रदेशातही जाणविले धक्के
Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : (New Delhi) नेपाळमध्ये(Nepal) ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे हादरे जाणविले. यात ६ जणांचा मृत्यू, तर ५ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, नेपाळच्या लष्कराकडून बचावकार्य करण्यात आले. या भूकंपात(earthquake) अनेक घरेदेखील जमीनदोस्त झाली आहेत. तर, दुसरीकडे राजधानी दिल्ली परिक्षेत्रातही भूकंपाचे हादरे जाणविले. यामध्ये दिल्ली-एनसीआर ते उत्तर प्रदेशमधील राजधानी लखनौ, कानपूर, मुरादाबाद, बरेली, आग्रा आणि मेरठसह अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. रात्री झोपलेल्या लोकांचे पलंग आणि छताचे पंखे अचानक हलू लागले. लागोपाठ दोन धक्के बसल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासात भूकंपाचे चार धक्के बसले आहेत. पहिला मंगळवारी रात्री ८:५२ वाजता बसला. ज्याची तीव्रता ४.९ रिश्टर स्केल, दुसरा रात्री ९:४१ वाजता ३.५ रिश्टर स्केलचा(Richter scale) झाला. यानंतर रात्री उशिरा १:५७ मिनिटांनी तिसऱ्यांदा ६.३ रिश्टर स्केलचा होता. त्यानंतर मध्यरात्री २:१२ वाजता आणखी एक भूकंप झाला. यातील दोन धक्के हे अन्य दोनच्या तुलनेत अधिक तीव्र होते. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी(एनसीएस)नुसार, भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये होते. एनसीएसने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भूकंपाची खोली जमिनीपासून १० किमी खाली होती.
नेपाळमधील दोती जिल्ह्यात एक घर कोसळले. त्या घराच्या ढिगाराखाली दबून तिघांचा मृत्यू झाला. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागडपासून ९० किमी अंतरावर दक्षिण पूर्वमध्ये भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जात आहे. दुसऱ्या भूकंपाचे केंद्रबिंदू काठमांडूपासून १५५ किमी. उत्तर पूर्वमधील १०० किमी परिसरात असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, भारतात रात्री उशिरा भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली-एनसीआरमध्ये(Delhi-NCR) लोकांचा एकच गोंधळ पाहायला मिळाला. राजधानीपासून नोएडा, गुडगाव, गाझियाबाद आणि इतर भागातही भूकंपाचे धक्के जाणविले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंपाचे केंद्र भारत-नेपाळ सीमेवरील धारचुला भागात जमिनीपासून १० किमी खाली बसला, तर नेपाळच्या कुळखेतीमध्ये भूकंपाचा दुसरा धक्का बसला. भूकंपामुळे भारतात तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.


