
रस्त्यावरील सांडपाणी थांबण्यासाठी पालिकेने लक्ष घातले
मुकुंद लांडगे
मुंबई : चेंबूरच्या सिध्दार्थ कॉलनीतील(siddhartha colony) मुख्य रस्त्यावर रोज येणारे गटारातील सांडपाणी थांबविण्यासाठी पालिकेने आता नव्याने गटारांचे काम सुरू केले आहे. त्यामुळे नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षभरापासून याबाबत पालिकेकडे स्थानिकांनी पाठपुरावा केला होता. अखेर पालिकेच्या एम पश्चिम विभागातील अधिकाऱ्यांनी याची दखल घेत आता जुनी गटारे तोडून ती नव्याने बांधण्याचे काम सुरू केले आहे.
सायंकाळी ४ ते ७ या वेळेत सिद्धार्थ कॉलनीतील मुख्य रस्त्यावर गटारातील सांडपाणी येऊन अक्षरशः येथे तलावाची स्थिती निर्माण होत होती, त्यामुळे महिलांना आणि शाळकरी मुलांना(school children) याचा त्रास होत होता. याबाबत वंचितचे दिलीप लोखंडे यांनी पालिकेकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यांनी आंदोलनाची हाकही दिली होती. त्यामुळे पालिकेचे उपआयुक्त हर्षल काळे यांनी यात लक्ष घालत आता येथील नागरी कामांना सुरुवात केली असल्याचे दिलीप लोखंडे यांनी सांगितले.
दरम्यान, महापालिकेकडून(municipal corporation) आता येथील गटारांचे बांधकाम करीत नव्याने झाकणे लावण्याची कामे सुरू केली आहेत. यासाठी १६ कामगार आणि यंत्रसामग्रीसह अभियंता कनप यांच्यासह सुपवायझर म्हात्रे हे लक्ष घालत आहेत. तर, त्यांच्या मदतीसाठी येथील दिलीप लोखंडे, रवी गायकवाड, अतुल कटारे, अनिल बेले हे उपस्थित राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
हे गटाराचे बांधकाम करताना महापालिकेने ज्या कंत्राटदाराला(contractor) हे काम दिले ते करताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत गटारातील गाळ काढला नाही. गटार तोडताना आत पडलेले रँबिट काढले नाही, त्यामुळे ही समस्या उद्भवली आहे, त्यामुळे या कंत्राटदाराला यापुढे पालिकेने काम तर देऊ नयेच, मात्र त्याला काळया यादीत टाकावे, असे दिलीप लोखंडे(वार्ड अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी) यांनी म्हटले आहे.


