
Indiagroundreport वार्ताहर
अहमदनगर : जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे(National Lok Adalat) आयोजन करण्यात आले आहे. या लोक न्यायालयामध्ये सर्वसामान्य तक्रारदार व नागरिक तडजोडी योग्य प्रकरणे सामंजस्याने मिटविण्यासाठी 10 नोव्हेंबर रोजी न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे प्रकरणाची यादी सादर करू शकतात, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा व जिल्हा विधी प्राधिकरणाच्या सचिव भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.
भारतीय दंड संहितेच्या फौजदारी प्रसंहिता कलम 320 प्रमाणे(न्यायालयाच्या परवानगीने) 298, 312, 323, 325, 334, 335, 337, 338, 341, 342, 343, 344, 346, 352, 355, 357, 358, 379, 381, 403, 406, 407, 411, 414, 417, 418, 419, 420, 421, 422, 423, 424, 426, 427, 428, 429, 430, 447, 448, 451(चोरीचा गुन्हा वगळता) 482, 483, 486, 491, 494, 497, 498, 500, 501, 502, 504, 506(1), 508 आणि 509 या कलमातील गुन्हे, लोक अदालतीमध्ये तडजोडीने मिटविता येतात. अन्य कायद्याच्या अंतर्गत तडजोडपात्र गुन्ह्यांच्या कलमांखाली प्रकरण दाखल केले असेल, तर लोक न्यायालयात तडजोडीसाठी प्रकरण ठेवता येते. त्यासाठी तक्रारदार/पीडित आणि आरोपी(ज्याच्या विरुध्द प्रकरण दाखल आहे ती व्यक्ती) आपसांत प्रकरण मिटवू शकतात. त्या प्रकरणांची यादी संबंधित न्यायालयात(Court) किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत दाखल करू शकता. लोक न्यायालयात सहभाग नोंदवून आपण वेळेची व पैशाची बचत करू शकता, असे आवाहनही यार्लगड्डा आणि भाग्यश्री पाटील यांनी केले आहे.


