
Indiagroundreport वार्ताहर
नांदेड : महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये गेले, एअरबसचा प्रकल्पही असाच गुजरातमध्ये अचानक गेला. कसा गेला?, हे कोणालाही कळले नाही. वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्पही गेला. लाखो कोटी रुपयांची गुंतवणूकही गेली व महाराष्ट्रातील तरुणांचे रोजगारही नरेंद्र मोदींनी हिरावून घेतले आहेत, असा घणाघाती हल्लाबोल राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी केला.
नांदेड जिल्ह्यातील कृष्णूर एमआयडीसी(Krishnaur MIDC) येथील आजच्या दिवसातील ‘भारत जोडो पदयात्रे’च्या संध्याकाळच्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण, खासदार रजनी पाटील, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, संजय निरुपम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आदी उपस्थित होते.
राहुल गांधी पुढे म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी ही पदयात्रा सुरू केली आणि आज महाराष्ट्रात(Maharashtra) आली आहे. उन्हातान्हात तुम्ही मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झालात, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. दिवसभर 7-8 तास दररोज चालतो. शेतकरी, तरुण, महिला, यांच्या समस्या ऐकूण घेतो. मला यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. रस्त्यावरून चालणे व गाडीतून चालणे यात फरक आहे. भारत समजून घ्यायचा असेल, तर रस्त्यावर चालले पाहिजे. रस्ते कसे आहेत ते आधी कळते, राज्याची अवस्था रस्त्यावरून कळते. शेतकरी, तरुण यांच्याकडून ऐकतो तेव्हा वाईट वाटते. 6 वर्षांपूर्वी नोटाबंदी केली त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. नोटाबंदी व जीएसटीने देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्सुनामी आली. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली.
ते पुढे म्हणाले की, सरकारी उद्योग खाजगी उद्योगपतींना विकले जात आहेत. सरकारी नोकऱ्या नाहीत, त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. पट्रोल, डिझेल, सिलिंडर गॅस महाग झाले. एकीकडे महागाई, तर दुसरीकडे बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. जनतेचा आवाज मोदी सरकार(Modi government) ऐकत नाहीत. संसदेत बोलण्यास सुरू केले की लगेच माईक बंद केला जातो. देशातील तरुण लष्करात भरती होऊन देशसेवा करू पाहत आहे, पण नरेंद्र मोदींनी त्यावर पाणी फेरले आहे, फक्त चार वर्षच सेवा करा आणि घरी बसा अशी व्यवस्था करून ठेवली आहे.
कोणालाही घाबरू नका, मनातील भीती काढून टाका. जो ही भीती घालवेल तो द्वेष पसरवू शकत नाही, म्हणून मनातून भीती काढून टाका, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. मुलगा व मुलगी यांच्यात भेदभाव(discriminate) करू नका, मुलींना समान वागणूक दिली पाहिजे. जो समाज, देश मुलींचा सन्मान करू पाहत नाही तो देश प्रगती करू शकत नाही, त्यासाठी मुलगा-मुलगी भेदभाव न करण्याचे आवाहनही राहुल गांधी यांनी यावेळी केले.


