
मुरजी पटेल यांची ऋतुजा लटकेंवर टीका
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : निवडणुकीतून माघार घेतली नसती, तर एक लाख २० हजार मते भाजपला मिळाली असती. मात्र, याच्यात आम्हाला पडायचं नाही, ऋतुजा लटकेंना मी शुभेच्छा दिल्या आहेत. पण, एका गोष्टीची खंत वाटत आहे. श्रद्धांजली आणि सहानुभूतीच्या नावावर मते मागितली आणि नंतर फटाके फोडले आणि ढोल वाजविले, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशी टीका मुरजी पटेल(Murji Patel) यांनी ऋतुजा लटकेंवर केली आहे.
अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ऋतुजा लटेके यांचा विजय झाला आहे. ऋतुजा लटकेंना ६६ हजार २४७ मते मिळाली आहे, तर नोटाला(Nota) १२ हजार ७७८ मते मिळाली असून, १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाकरे गटाचा पहिलाच दणदणीत विजय आहे. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला आहे. यावर भाजपचे नेते मुरजी पटेल यांनी टीका केली आहे.
अंधेरीला(Andheri) पहिल्या महिला आमदार भेटल्या आहेत. त्यांना प्रत्येक कामात सहकार्य करु. मात्र, बांद्रा येथील तृप्ती सावंत यांच्याबद्दल जे घडले, तसे २०२४ ला ऋतुजा लटके यांच्याबद्दल होऊ नये, हीच अपेक्षा आहे. तसेच, एकाही भाजप कार्यकर्त्याने नोटाला मतदान करण्यास सांगितलेले नाही. स्वत:चा कमीपणा समोर येऊ नये, म्हणून असा आरोप करण्यात येत आहे. १ लाख ९० हजार लोकांनी मतदान केलेले नाही, याचे उत्तर महाविकास आघाडीला द्यावे लागले, असेही मुरजी पटेल यांनी म्हटले.


