
Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : (New Delhi) सध्या दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये मूसळधार पाऊस पडत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे(Heavy Rain) नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, पुढील ३ दिवस काही राज्यांमध्ये मूसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू आणि केरळच्या किनारी भागात मूसळधार ते अति मूसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय कर्नाटक, रायलसीमा, कोस्टल आंध्र प्रदेश, लक्षद्वीपमध्ये मूसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार(Meteorological Department), दक्षिण आंध्र प्रदेश-तामिळनाडू-पुडुचेरी, लक्षद्वीप आणि कोमोरिन भागात 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. याशिवाय, पुढील 24 तास लक्षद्वीप, मालदीव-कोमोरिन परिसर आणि केरळच्या काही भागात जोरदार वारे वाहू शकतात. पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा धोका लक्षात घेता, हवामान खात्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी, श्रीलंकन किनारपट्टी, मन्नारचे आखात आणि लगतच्या कोमोरिन परिसर, तसेच नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य भागातील मच्छिमारांना समुद्रकिनारी न जाण्याचा सल्ला दिला आहे.
हवामान खात्याने ताज्या अपडेटमध्ये(update) सांगितले आहे की, येत्या 48 तासात जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. बदलत्या हवामानामुळे या राज्यांमध्ये तापमानात घट होणार असून, थंडी आणखी वाढू शकते.
16 नोव्हेंबर रोजी आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि अंदमान समुद्रालगतच्या(Andaman Sea) भागात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस किमान तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही. त्याचवेळी, वायव्य भारतातील काही भागांमध्ये तापमानात 2 ते 4 अंश सेल्सिअसने घट होऊ शकते.