India Ground Report

Mumbai : 15 नोव्हेंबर रोजी अंगणवाडीसेविकांचा मंत्रालयासमोर मोर्चा

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा मोर्चा

दीपक पवार
मुंबई : तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या जालना जिल्ह्यातील एका अंगणवाडी सेविकेने(anganwadi worker) अंगणवाडीतच आत्महत्या केल्याची दुःखद घटना नुकतीच घडली. या घटनेने संतप्त झालेल्या महाराष्ट्रातील अंगणवाडीसेविका यानिषेधार्थ मंगलवारी(१५ नोव्हेंबर) मंत्रालयासमोर मोर्चा काढणार आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, पोषण ट्रॅकर व ग्रॅच्युईटीबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन व इतर अन्य महत्वाच्या न्याय्य मागण्यांसाठी राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगलवारी १५ नोव्हेंबर रोजी मंत्रालयासमोर(ministry) मोर्चा काढण्यात येणार असून, आझाद मैदानावर १२ वाजल्यापासून निदर्शने सुरू होतील आणि ती मुख्यमंत्री किंवा महिला बालविकास मंत्री यांची भेट होऊन मागण्यांवर ठोस तोडगा निघेपर्यंत सुरूच राहतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो अंगणवाडी कर्मचारी यात सहभागी होण्यासाठी मुक्कामाच्या तयारीने येत आहेत. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे नेते एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील करणार आहेत, अशी माहिती अंगणवाडी नेत्या कॉ. शुभा शमीम यांनी दिली.

एका बाजूला महागाई(inflation) प्रचंड वाढलेली आहे, तर दुसरे म्हणजे आम्ही शासनाला ३१ ऑक्टोबर रोजी चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याची व अशी चर्चा न घडवून आणल्यास १५ नोव्हेंबर रोजी मंत्रालयासमोर मोर्चा काढण्याबाबत नोटीस पाठविली होती. परंतु, अशी कोणतीही बैठक न घेतल्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा मोर्चा काढावा लागलेला आहे, असेही कॉ. शुभा शमीम यांनी सांगितले.

एका बाजूला अंगणवाडी कर्मचाऱ्यांवरील कामाचे ओझे व ताण-तणाव यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. कामाच्या ताणामुळेच या आत्महत्या होत आहेत. गेली ५ वर्षे राज्यशासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात कोणतीही वाढ केलेली नाही. केंद्र शासनाने(central government) देखील गेली ४ वर्षे मानधनात वाढ केलेली नाही, असा आरोप कॉ. शुभा शमीम यांनी केला.

कृती समितीच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे राज्यशासन मानधनात(salary) वाढ करेल, अशी अपेक्षा होती व शासनाने देखील त्याबाबतीत कृती समितीसोबत बैठक घेतली, तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सवर चर्चा केली व दिवाळीपूर्वी मानधन वाढविण्याचे आश्वासन दिले, तसेच यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन घोषित देखील केले, परंतु प्रत्यक्षात ही मानधनवाढ झालेली नाही. त्यामुळे मानधनवाढीसाठी हा राज्यव्यापी मोर्चा आयोजित केला आहे. मुख्य २२ मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात येत आहे.

Exit mobile version