समर प्रताप सिंग
ठाणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्यावतीने राज्यातील अनुसूचित जातीतील नागरिकांसाठी 10 लाखापर्यंतची थेट कर्ज योजना सुरू झाली आहे. या योजनेसाठी 23 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक(district manager) वंदना राणे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील १२ पोटजाती मांग, मातंग, मिनीमादीग, मादींग, दानखणी मांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांग गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील १८ ते ५० वर्षे या वयोगटातील दारिद्रय रेषेखालील बेरोजगारांकरिता ही योजना लागू आहे.
महामंडळाची(The Corporation) 10 लाख रुपये प्रकल्प मर्यादा असलेली थेट कर्ज योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत ठाणे जिल्हयाकरिता ५० जणांना कर्ज देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील. राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना, तसेच सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसापैकी एका सदस्यास प्राधान्य देण्यात येईल.
कर्ज योजनेच्या अर्जाकरिता पुढे नमूद केलेल्या पात्रता व अटी/शर्ती व निकषांची पूर्तता करणारा अर्जदार पात्र राहील. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. मातंग समाज व त्यातील १२ पोटजातीतील असावा. अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्ष असावे. अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर ५०० असावा. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ३ लाख यापेक्षा जास्त नसावे. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल. व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव/ प्रशिक्षित असावा. महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार, व्यवसायास अनुरूप असलेली आवश्यक ती कागदपत्रे/प्रमाणपत्रे/करारपत्रे/कर्जमागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. कर्ज प्रस्ताव सादर केल्यानंतर महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार मंजुरी संदर्भातील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
इच्छुक अर्जदारांनी महामंडळाच्या ठाणे(Thane) येथील जिल्हा कार्यालयाच्या जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, जिल्हाधिकारी कार्यालय, 5 वा मजला, ठाणे 400601. (दूरध्वनी क्रमांक 022-25388413) या पत्त्यावर दि. 24 नोव्हेंबर 2022 ते 20 डिसेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वंदना राणे यांनी केले आहे.