
Mumbai : काश्मिरी पंडितांच्या मुद्यावर भाजपने फक्त राजकीय पोळ्या भाजल्या : सचिन सावंत

प्रशांत बारसिंग
मुंबई : (Mumbai ) काश्मिरी पंडितांच्या(Kashmiri Pandits) मुद्यावर भाजपने फक्त राजकीय पोळ्या भाजल्या, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली. सावंत म्हणाले की, काश्मिरी पंडितांबद्दल भारतीय जनता पक्षाला काहीही देणेघेणे नसून त्यांच्याबद्दलचा कळवळा हा केवळ देखावा होता. राहुल भट या काश्मिरी पंडित तरुणाच्या हत्येसोबत लाखो काश्मिरी पंडितांच्या आशा, आकांक्षा आणि स्वप्नांची चिताही रचली गेली आहे. काश्मिरी पंडितांच्या आजच्या विदारक परिस्थितीला भाजपच जबाबदार आहे. मोदी सरकारने गेली ८ वर्षे काश्मिरी पंडितांच्या दुखाग्नीवर राजकीय पोळ्या भाजल्या आणि सत्तेच्या बाजारात काश्मिरी पंडितांचे दुःख विकले हे स्पष्ट झाले आहे.
काश्मिरी पंडितांच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी सरकारचा समाचार घेतना सचिन सावंत(Sachin Sawant) पुढे म्हणाले की, भाजप समर्थित व्ही. पी. सिंह सरकारच्या काळात काश्मिरी पंडितांचे स्थलांतर झाले, त्यावेळी भाजपचेच के. जगमोहन हे राज्यपाल होते. याच काळात काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या व पलायनास मजबूर केले गेले, तरीही काश्मिरी पंडितांचे दु:ख व कलम ३७०चे भांडवल सातत्याने भाजप करीत राहिली. २०१९ला ३७० कलम हटविताना काश्मीरमधील दहशतवाद संपेल व पंडितांची घरवापसी होईल असे आश्वासन दिले, पण मोदी सरकारच्या काळात दहशतवाद संपलेला नाही, तर पूर्वीपेक्षा अधिक वाढला आहे.
देशभर मुस्लीम द्वेष पसरविण्यासाठी भाजपने काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचा, अनुपम खेरसारख्या पिट्टूचा व अंकीत मीडियाचा वापर केला. ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे प्रमोशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वत: केले. जनभावना भडकाविण्यासाठी चित्रपटात अर्धसत्य व अंगावर शहारे आणणाऱ्या हिंसेचा वापर केला गेला. या चित्रपटातून निर्मात्यांनी २५० कोटींपेक्षा जास्त कमाविले, पण काश्मिरी पंडितांचे हात मात्र रिकामेच राहिले. आज काश्मीरमध्ये जे सुरु आहे ती कोणत्या चित्रपटाची कथा नसून वास्तविकता आहे हे चित्रपटाचे प्रमोशन करणाऱ्या प्रधानमंत्री मोदी व भाजपने लक्षात घ्यावे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वातील यूपीए सरकारच्या दहा वर्षांत ३००० पेक्षा जास्त पंडितांना नोकऱ्या दिल्या. ५९११ घरे बांधली, पण मोदी सरकारने(Modi government) काहीच केले नाही. उलट काश्मिरी मुसलमानांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले व काश्मिरी पंडितांपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. यातून स्थानिक पंडितांचे जीव धोक्यात घातले गेले. आज केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि जम्मू काश्मीरमध्ये भाजपने नियुक्त केलेले राज्यपाल मनोज सिन्हा आहेत, त्यामुळे राहुल भटच्या सरकारी कार्यालयात झालेल्या हत्येनंतर पंडित सुरक्षिततेवरुन मोदी सरकारला जाब विचारत आहेत. आठ वर्षांत काय केले? हा प्रश्न विचारत आहेत. यावर पोलीस अश्रूधूर व लाठ्यांचा वर्षाव करीत आहेत. काश्मिरी पंडितांवर अतीव कणव व्यक्त करणारी भाजप इतकी निष्ठूर होताना पाहणे अविश्वसनीय आहे. आधीच अत्याचारग्रस्त पंडितांवर आताचे अत्याचार होतानाचे चित्र विदारक आहे.
काश्मिरी पंडितांचे डोळे आता उघडले आहेत आणि भाजपकडून धर्मांधतेची अफूची गोळी खाल्लेल्यांचे डोळेही उघडतील, अशी आशा सावंत यांनी यावेळी व्यक्त केली.