
Mumbai : कोरोनाचा धोका; केंद्रीय आरोग्य सचिवांचा 7 राज्यांना सतर्कतेचा इशारा

Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : देशातील वाढत्या कोरोना रुग्णांची(corona patients) संख्या लक्षात घेता केंद्राने सात राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, केरळ, कर्नाटक, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या आरोग्य सचिवांना याबाबत पत्र लिहिले आहे. या राज्यांमध्ये आठवड्याचा कोरोना संसर्गाचा दर १० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या राज्यांनी लसीकरण मोहिमेला वेग देण्यासोबतच कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या आहेत.
येत्या काळात अनेक सण-उत्सव भारतात साजरे केले जातील. यासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कोरोनाच्या संसर्गासह त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे आरोग्य मंत्रालयाने(health ministry) म्हटले आहे.
दरम्यान, भारतात गेल्या २४ तासात १९ हजार ४०६ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील पाच, छत्तीसगढमधील ३, दिल्ली, जम्मू-काश्मीर, राजस्थान, गुजरात, त्रिपुरा आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येकी दोन, तर हरियाणा, केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, नागालँड, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील एका रुग्णाचा समावेश आहे. तर, ५७१ रुग्ण बरे होऊन घरीदेखील परतले आहेत.
संक्रमित रोगांचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोनापासून बचावासाठी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अत्यंत आवश्यक आहे, असेही सांगण्यात आले आहे.