
Mumbai : ‘त्या’विरोधात 5 ऑगस्ट रोजी काँग्रेसचा राजभवनला घेराव : नाना पटोले

महागाई, जीएसटी, बेरोजगारी व ‘अग्निपथ’ योजनेचा करणार विरोध
प्रशांत बारशिंग
मुंबई : (Mumbai) केंद्रातील भाजप सरकारच्या(BJP government) मनमानी कारभारामुळे महागाईचा आगडोंब उसळला असतानाच जीवनाश्यक वस्तूंवरही जीएसटी लावून मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला देशोधडीला लावू पहात आहे. बेरोजगारीचा उच्चांक झाला असून, तरुणवर्गाचे भवितव्य अंधारात आहे. महागाई, बरोजगारी व ढासळत्या अर्थव्यवस्थेला केंद्र सरकारची चुकीची धोरणे कारणीभूत आहेत, यासाठी उद्या ५ ऑगस्ट रोजी राजभवनला घेराव घातला जाणार असून, त्यानंतर ‘जेल भरो’ करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज दिली आहे.
मागील ४५ वर्षांतील बेरोजगारीने उच्चांक गाठला
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) पुढे म्हणाले की, पेट्रोल, डिझेल, एलपीसी गॅस, सीएनजी व पीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त असताना केंद्र सरकारने दूध, दही, पनीर, पीठ, तेल, तूप यासह जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. मोदी सरकारने जीएसटीतून शाळकरी मुलांनाही सोडले नाही, शालेय वस्तूंवरही जीएसटी लावला आहे. रुग्णालयात उपचार घेण्यावरही जीएसटी भरावा लागणार आहे. मागील ४५ वर्षांतील बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत विविध विभागांमध्ये नोकऱ्यांसाठी २२ कोटी अर्ज मिळाले, मात्र केवळ ७ लाख उमेदवारांना नोकरी देण्यात आल्याचे केंद्र सरकारनेच लोकसभेत सांगितले आहे. एवढी भयानक अवस्था आहे, तर लष्करात भरती होऊन देशाची सेवा करु पाहणाऱ्या तरुणांना फक्त ४ वर्षांची सेवा व नंतर निवृत्ती अशी ‘अग्निपथ’ नावाची योजना आणली आहे. या योजनेला तरुणवर्गाचा तीव्र विरोध असून, काँग्रेस पक्ष त्या तरुणांच्या पाठिशी भक्कमपणे उभा आहे. ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान
अतिवृष्टीमुळे(heavy rains) विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्यावी, तसेच राज्यात ओलादुष्काळ जाहीर करावा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल बोलून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्राचा व महापुरुषांचा अवमान करीत असतात. मुंबईबद्दल बोलूनही त्यांनी मराठी माणसांचा अवमान केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपालपदाची प्रतिष्ठा धुळीस मिळविली असून, त्यांच्या बोलण्यातून भाजप व आरएससची शिकवणच नेहमी दिसून येते, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
त्यानंतर ‘जेल भरो’ केले जाणार
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत उद्या सकाळी ११ वाजता हँगिंग गार्डन ते राजभवन असा मोर्चा काढून राजभवनला(Raj Bhavan) घेराव घातला जाईल व त्यानंतर ‘जेल भरो’ केले जाणार आहे. राज्यात सर्व जिल्हा मुख्यालयी स्थानिक नेते आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवतील.