Mumbai : प्लास्टिकचा लेप व थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर प्लास्टिक बंदी नियमात सुधारणा
प्रशांत बारसिंग
मुंबई : प्लास्टिक लेप आणि प्लास्टिकचा थर(plastic layer) असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. राज्यातील प्लास्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाने(The central government) १ जुलै २०२२ पासून सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घातली असून, राज्यात या बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र हे सिंगल युज प्लास्टिक बंदी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इत्यादींवर बंदी

राज्यात(in the state) प्लास्टिक बंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक शक्तिप्रदत्त समिती नेमण्यात आली होती. या समितीने ७ जुलै २०२२ रोजीच्या बैठकीत महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकॉल उत्पादने अधिसूचना २०१८ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्य शासनाने १५ जुलै २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे प्लास्टिक लेपात आणि प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर देखील बंदी घातली आहे. या सुधारणेनंतर राज्यात प्लास्टिक लेप (Coating), तसेच प्लास्टिक थर (Laminated) असणाऱ्या पेपर किंवा ॲल्युमिनियम इत्यादीपासून बनविलेले डिस्पोजेबल डिश, कप, प्लेट्स, ग्लासेस, काटा, वाडगा, कंटेनर इत्यादी वस्तू एकदा वापरावर आणि उत्पादनावर आता बंदी असणार आहे. दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचा कचरा कमी करणे हा बंदीमागचा मुख्य उद्देश आहे.
‘हा’ कचरा थेट जाळला जातो
राज्यातील शहरे, ग्रामीण भागात दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे(plastic) प्रमाण लक्षणीय असून, यातील कचऱ्याचे विघटन व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. हा कचरा कचरा डेपो, जलाशयांमध्ये फेकला जातो किंवा पुनर्प्रक्रिया शक्य नसल्याने रात्रीच्या वेळी हा कचरा थेट जाळला जातो. सध्या राज्यात सिंगल युज प्लास्टिकमध्ये कप, प्लेट्स, वाडगा, चमचे, कंटेनर इत्यादींच्या वापरावर बंदी आहे, परंतु सध्या बाजारामध्ये डिश, कंटेनर, ग्लास, कप इत्यादी पेपरच्या नावाखाली प्लास्टिक लेप असलेले किंवा प्लास्टिक लॅमिनेशन केलेल्या या वस्तू मोठ्या प्रमाणात वापरल्या जात आहेत. या सर्व वस्तूंमध्ये सुद्धा प्लास्टिक आहे. विघटनास घातक ठरणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकचे आक्रमण रोखण्यासाठी हे बंदीचे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.