
Article: जागतिक साहित्यिक लोकशाहीर काॅ.अण्णा भाऊ साठे यांचा महाराष्ट्र सरकारला पडला विसर

जागतिक साहित्यिक, कलावंत लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचा, १ ऑगस्ट हा दिवस त्यांची जयंती महाराष्ट्रा सह देशभरात साजरी केली जाते. मात्र महाराष्ट्राला अण्णाभाऊंच्या कार्याचा विसर पडलेला दिसतो. म्हणूनच महाराष्ट्रातील कलाकार, संगीतकार,नाटककार,शाहीर, गायक, गीतकार सर्व क्षेत्रांतील कलाकार,साहित्यक, पत्रकार ,चित्रकार, बुद्धिवंत आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळ, लोक सांस्कृतिक मंच, प्रगतिशील लेखक संघ, जनवादी लेखक संघ, दलित पँथर सुवर्णमहोत्सव समिती, जाती अंत संघर्ष समिति, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन,मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना खुले पत्र देऊन एक साधी आणि अत्यंत महत्वाची मागणी केली आहे. लोकशाहीर काॅ. अण्णा भाऊ साठे यांचा, १ ऑगस्ट हा जन्म दिन, “लेखन प्रेरणा दिन” म्हणून घोषित करा.. खरतर हि मागणी मुख्यमंत्र्यांनी लागलीच मान्य करायला पाहिजे. या मागणीला सरकारने आढेवेढे घेता काम नये. हि मागणी मान्य करून सरकारने लोकशाहीर काॅ. अण्णा भाऊ साठे यांचा विषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे.
काॅ.अण्णा भाऊ साठे फक्त केवळ लेखक, कलावंत नव्हते, तर ते भारतातील कम्युनिस्ट लढ्यातील अंतरराष्ट्रीय सांस्कृतिक नेते होते. ते प्रत्यक्ष येथील दलित-शोषित, कामगार, शेतकर्यांच्या शोषण मुक्तीच्या चळवळीत, स्वातंत्र्य चळवळीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, गोवा मुक्ती आंदोलनात सक्रिय सहभागी होते. अण्णाभाऊंनी शेकडोदा, तुरूंगवासही भोगला होता. कम्युनिस्ट पक्षाच्या “लाल बावटा कला पथका” माध्यमातून कॉम्रेड अण्णा भाऊ साठे शाहीर काॅ. अमर शेख, शाहीर काॅ.दत्ता गव्हाणकर यांच्या सोबतीने त्यांनी आपल्या गाणी, पोवाडे, लोकनाट्यातून महाराष्ट्रच नव्हे तर देश ढवळून काढला व प्रचंड जन जागृती करून मोठे योगदान दिले. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील विविध विद्यापीठातील तरूण संशोधक आज अण्णा भाऊंच्या साहित्य, कर्तृत्वावर अभ्यास, संशोधन करीत आहेत. अण्णा भाऊ साठे यांच्या हयातीतच त्यांच्या साहित्याचे, पोवाड्यांचे भारतातील विविध भाषांत अनुवाद झालेत. इतकेच नाही तर इंग्रजी,
रशियन, झेक, पोलीश, जर्मन, फ्रेंच आदी. भाषांतही अनुवाद होऊन ते जगभर गेले आहे. सातासमुद्रा पार अण्णाभाऊ आपल्या साहित्याने तळपत आहेत. जगभरात अण्णाभाऊंचे साहित्य स्वीकारले गेले आहे.
प्रचंड कर्तृत्व असतानाही प्रस्थापित हिंदू जात-वर्गिय व्यवस्थेचे समर्थक आणि ब्राम्हणी-भांडवली साहित्य संस्कृतीच्या ठेकेदारांनी, तळागाळातील दलित-शोषित समाजातून आलेल्या काॅ.अण्णा भाऊ साठे यांची जिवंत असताना उपेक्षा केली. मात्र मृत्यूनंतरही आणि त्यांचे २०२० हे जन्म शताब्दी वर्ष सरल्या नंतरही, ही उपेक्षा आजतागायत चालू आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाचा सतत घोष करणाऱ्या महाराष्ट्र राज्यासाठी आणि साहित्य-संस्कृती क्षेत्रासाठी ही अत्यंत लांच्छनास्पद गोष्ट आहे. याना अण्णाभाऊंचा विसर पडला याला काय म्हणावे. महाराष्ट्र राज्याने आणि साहित्य क्षेत्राने अण्णा भाऊंच्या उपकारातून उतरायी होण्यासाठी १ ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस देशभर लेखन प्रेरणा दिन म्हणून शाळा, महाविद्यालयांमध्ये साजरा करावा अशी मागणी आता लोकप्रतिनिधींसह जनतेने हि केली आहे. उलट महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन लेखन प्रेरणा दिन’ करावा कारण काॅ.अण्णा भाऊ साठे महाराष्ट्रात जन्मले होते. १८ जुलै काॅ.अण्णा भाऊ साठे यांचा स्मृती दिन आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील साहित्यिक, कलावंत, सांस्कृतिक, सामाजिक संघटना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली कि, १ ऑगस्ट हा अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिवस, जयंती आहे. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी १ ऑगस्ट हा “लेखन प्रेरणा दिन” म्हणून शासनाच्या वतीने अधिकृतपणे घोषित करण्यात यावा, या योग्य मागणीचा राज्य सरकारने अंमलबजावणी करायला कुठल्याही मुहूर्ताची गरज आहे. लढाऊ आणि नवोदित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीचा विचार करून अंमलबजावणी केली तर महाराष्ट्रातील मराठी माणूस आभारच मानतील.
भारतात ५ सप्टेंबर हा डॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा केला जातो. ११ नोव्हेंबर हा मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. तर ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘बालिका दिवस’ म्हणून साजरा केला जातो. दि. २७ फेब्रुवारी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा ‘मराठी दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच रामानुजन यांचा जन्म दिवस ‘गणित दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जीवन व कार्याचा आढावा घेतला जातो. त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंगांच्या आधारे शाळा, महाविद्यालयात निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने विद्यार्थी त्या महापुरुषांच्या आयुष्यातील विविध घटना आणि कार्य या विषयाची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. एकूणच त्या महापुरुषांच्या जीवन व कार्याची उजळणी होते त्या निमित्ताने त्यांच्यावरील पुस्तकांचे वाचन केले जाते.
लोकशाहीर काॅ. अण्णा भाऊ साठे फक्त एकच दिवस शाळेत गेले होते परंतु त्यांनी मराठी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या क्रांतिकारी लिखाणाने इतिहास घडवला. ‘दलित साहित्या’चा पाया रचण्यात काॅ.अण्णा भाऊ साठे यांचे मोलाचे योगदान होते. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही लेखन केले. कथा, कादंबरी, नाटक, पोवाडा, लावण्या, चित्रपट, पटकथा, लेखन या क्षेत्रात त्यांनी मनसोक्त मुसाफिरी केली. काॅ.अण्णा भाऊ साठे यांनी कलावंत म्हणून लोकनाट्य, नाटक, चित्रपटातून उत्कृष्ट भूमिकाही केल्या होत्या, ते अष्टपैलू साहित्यिक,कलावंत होते. “इंडियन पिपल्स थियेटर असोसिएशन” (इप्टा), या सुप्रसिद्ध पुरोगामी नाट्य संस्थेचे ते अखिल भारतीय अध्यक्षही होते. त्याकाळात त्यांच्या सोबत सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.होमी भाभा,सूप्रसिध्द नाट्य सिने कलावंत बलराज सहानी आदी. कार्य करीत असत. लोकशाहीर काॅ.अण्णा भाऊ साठे यांचे जागतिक पातळीवर क्रांतिकारी योगदान आहे. आणि हि महान व्यक्ती महाराष्ट्रातील माती मधली आहे. राज्य सरकारने या सर्व गोष्टींचा विचार करून लोकशाहीर काॅ.अण्णा भाऊ साठे यांचा, १ ऑगस्ट हा जन्म दिन, “लेखन प्रेरणा दिन” म्हणून घोषित करून शिंदे सरकाने त्याचे श्रेय हि घ्यावे.
- दिपक पवार